पुणे, १२ जुलै २०२५: बाणेर-बालेवाडी परिसरात वर्षानुवर्षे सतावत असलेल्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या अभावासंदर्भात आज महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सण-उत्सवांपूर्वी सर्व समस्या मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले.
या बैठकीस पुणे महापालिका, वाहतूक पोलीस, पोलीस आयुक्तालय, महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत आमदार पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले.
बैठकीत नागरिकांनी जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक परिसरातील वाहतूक नियोजन, सिग्नल यंत्रणा, वॉर्डन्सची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अपूर्ण रस्त्यांचे काम, ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशन उभारणी व दारू दुकानांमुळे होणारा त्रास अशा मुद्द्यांवर भर दिला.
विशेषत: नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, बसस्टॉपची गरज, पदपथ अतिक्रमण, झाडांची छाटणी, रस्त्यांचे व फूटपाथचे डागडुजी, तसेच मेट्रो पुलाखालच्या पाण्याच्या समस्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने यावर तत्काळ उपाय करण्याचे आश्वासन दिले.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपास संदर्भातही बैठक झाली. एनएचएआय अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीत बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे, सोमेश्वरवाडी परिसरातील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, आणि सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, अस्मिता करंदीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीने बाणेर-बालेवाडी परिसरातील समस्यांबाबतची प्रशासनाची उदासीनता संपुष्टात येईल आणि प्रत्यक्षात बदल घडेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल