May 15, 2025

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, २ मे २०२५: पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी 1 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे.

इच्छुकांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा ‘एएच-एमएएचएबीएमएस’ मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा. अर्ज करताना दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबतचे संदेश पाठविले जाणार असल्याने अर्जदाराने कोणत्याही स्थितीत मोबाईल क्रमांक बदलू नये.

अर्जदाराने एखाद्या योजनेकरीता एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या प्रतिक्षा यादीतील अर्जदारांनाही नव्याने अर्ज न करता योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.