पुणे, २४ फेब्रुवारी २०२५ ः राजकीय कार्यकर्के, पुढाऱ्यांकडून अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावून रस्ते, चौकांचे विद्रूपीकरण केले जाते. यातून महापालिकेचा महसूलही बुडतो. मात्र, आता कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय चमकोगिरीला पायबंद लागणार आहे. आमदार हेमंत रासने यांनी मी स्वतः अनधिकृत फ्लेक्स लावणार नाही व भाजपच्या कार्यकर्त्यांना लावू देणार नाही अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली आमदार रासने म्हणाले,‘‘फ्लेक्स लावले म्हणजेच निवडणूक जिंकता येते असे नाही. फ्लेक्स न लावताही आम्ही कसब्यातील २४ नगरसेवक महापालिका निवडणुकीत निवडून आणू. कसबा मतदारसंघ स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात माझ्या स्वतःपासून करत आहे. स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्षे पहिला क्रमांक मिळणाऱ्या इंदूर शहराचा काही दिवसांपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अभ्यास दौरा केला. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिमान प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतु:सूत्री असल्याचे निदर्शनास आले.
लोकसहभागाची सुरुवात मी स्वतः पासून करण्याचे ठरविले आहे. या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतला आहे. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.
स्वच्छता नारायणाची पूजा
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या तीन महिन्यात मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारे २६क्रॉनिकल स्पॉट सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत या २६ ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’च्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन यावेळी केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ११ वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या अभिनव स्वच्छता नारायण महापूजा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मी करतो.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भूयारी मार्ग
आमदार रासने यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये १८ मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करावे यासह वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग बांधावा अशी मागणी केली आहे, ही मागणी व्यवहार्य ठरते का हे पाहावे लागणार आहे.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार