May 15, 2025

बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी, तर कोकण विभागाचा निकाल अव्वल

पुणे, ५ एप्रिल २०२५ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली असून त्यानुसार यंदा नऊ विभागात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असल्याचे नमूद करण्यात आले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल हा ९१ .८८ टक्के असून यात सर्वाधिक कोकण विभागाचा निकाल हा ९६.७४ टक्के तर सर्वात कमी लातूर विभागाचा ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. असे यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

निकालातील ठळक बाबी-
– या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
– खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३.
– या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
– या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधील शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
– इयत्ता १२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
– सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे.
– सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे.
– एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १००% आहे.

शाखानिहाय निकाल –
शाखा विभाग निकाल पहिल तर विज्ञान विभागाचा निकाल हा ९७.३५ टक्के, कला विभागाचं निकाल हा ८०.५२,वाणिज्य विभागाचा निकाल हा ९२.६८,व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल हा ८३.२६ टक्के, आय.टी.आय विभागाचा निकाल ८२.०३ टक्के असा एकूण निकाल हा ९१.८८ टक्के लागलं आहे.यंदाचा निकाल हा मागच्या वर्षी पेक्षा १.४९ ने कमी लागला आहे.

कोकण विभाग अव्वल –
नऊ विभागात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल असून कोकण विभागाचा निकाल हा ९६.७४ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल हा ९३.६४ टक्के,मुंबई विभागाचा निकाल ९२.९३ टक्के,छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९२.२४,अमरावती विभागाचा निकाल हा ९१.४३ टक्के,पुणे विभागाचा निकाल हा ९१.३२ टक्के,नाशिक विभागाचा निकाल ९१.३१,नागपूर विभागाचा निकाल ९०.५३ टक्के,लातूर विभागाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे.