May 15, 2025

आर्टिफिशीयल इंटेलिजन्समध्ये भारत मोठी प्रगती करेल : चंद्रकांत पाटील

पुणे, दि. ४ एप्रिल, २०२५ : आज भारतात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वापराचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात देशाने उशिराने सुरवात केली असली तरी, नजीकच्या भविष्यात आपला देश त्यामध्ये मोठी प्रगती करेल, असा विश्वास राज्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई) आणि एमईएसचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रीय मंडळ व एमईएसचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. संजय सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ संजय तांबट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ विवेक सावंत, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. सुदाम शेळके आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ. उमेश बिबवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतामध्ये विशेष म्हणजे पुण्यात तयार करण्यात आलेला रणगाडा अमेरिकेमध्ये दिसला, यावरून आपण प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, “अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रातच एआयचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यामध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर भविष्यकाळात एआयच्या वापरावर अधिक भर देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारचा प्रयत्न आहे. एआयचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य सरकारने राज्यामध्ये एआय विद्यापीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात हे विद्यापीठ सुरु होईल.”

आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा विषय हा काळजीपूर्वक हाताळण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन झाले, त्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. तेव्हा, त्यांच्या अध्यक्षतेखाली ४० जणांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर माझी चर्चा सुरु होती. तेव्हा त्यांनी एआयचा वापर आणि त्याची उपयुक्तता कशी आहे, हे आपल्याला थेट प्रात्यक्षिक करूनच दाखवले. राज्यात विविध शहरातील पालकमंत्री नेमण्याची प्रक्रिया तेव्हा झाली नव्हती, ती यादी त्यांनी एआयच्या माध्यमातून मला करून दाखवली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्यांना ही यादी दाखवली, तेव्हा त्यांनी ही यादी सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार करण्याची सूचना केली, त्यानुसार यादी काढली. तेव्हा सध्या असणारे पालकमंत्री हे एआयचा वापर करून नेमण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी गंमतीमध्ये यावेळी सांगितला.

महिलांना स्तनांचा कर्करोग असतो, त्याची तपासणी करण्याबरोबरच शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण शोधण्यासाठी एआयच्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापराव पवार यांची भेट झाली तेव्हा त्यांनी एआयच्या तंत्राचा वापर करून उसाचे उत्पादन दुप्पट करता येऊ शकते, हे सांगितले.

एआयच्या सहाय्याने इथेनॉलची निर्मिती वाढवणे शक्य होईल. भारत सध्या १६ लाख कोटी कच्चे तेल आयात करतो, त्याचे प्रमाण कमी होईल. पेट्रोलमध्ये ७० टक्के इथेनॉलचे मिश्रण केले तर देशात २० रुपये लिटर दराने पेट्रोल देता येणे शक्य होऊ शकते, ही सगळी किमया एआयमुळेच शक्य होऊ शकते, असे पाटील यांनी नमूद केले. क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रात एआयचा वापर चांगल्या प्रकारे करता येणे शक्य असल्याचे पाटील यांनी यावेळी संगितले.

भारत हे विकसनशील राष्ट्र म्हणून प्रगती करत आहे, त्यामुळे २०४७ मध्ये आपल्याला अपेक्षित असणारा देश घडवण्यासाठी आपल्याला एआयच्या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनावणे यावेळी म्हणाले.

स्पोर्ट्स सायन्स प्रोफेशनल्स, शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले, स्पोर्ट्स कोचेस, प्रीसर्व्हिस, इन सर्व्हिस प्रोफेशनल्स, शिक्षक, एज्युकेटर्स, खेळाडू, टेक्नॉलॉजी- इनोव्हेशन एक्सपर्ट्स, संगणक, आयटी, स्पोर्ट्स अभियंते, फिटनेसची आवड असणारे, हेल्थ- वेलनेस प्रोफेशनल्स, अॅडमिनिस्ट्रेटर्स असे सर्वजण परिषदेमध्ये सहभागी झाले असून सदर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा भूतकाळ व वर्तमानकाळ, नवकल्पना आणि क्रीडा, फिटनेस, शारीरिक शिक्षण, शिक्षण या क्षेत्रातील नवकल्पनांवर उहापोहा होईल. क्रीडा, फिटनेस आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना, एआय कसे प्रभावीपणे काम करू शकतात, हे समजून घेण्यासाठी या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करीत आहे.

रोहन दामले यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. डॉ. किशोर देसरडा यांनी आभार मानले.