October 27, 2025

पुणे: वनविभागाच्या सौर कुंपण योजनेचा होतोय शेतकऱ्यांना लाभ

जुन्नर, ०२/१२/२०२४: बिबट्यांकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाच्या सौर कुंपण योजनेचा बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असून सौर कुंपनामुळे बिबट्या आता घराजवळही येत नाही.

जुन्नर वनविभागाने बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या आहेत.सौर कुंपण योजना ही अत्यंत प्रभावी उपाययोजना ठरली आहे.सौर कुंपणामुळे बिबट्याला हलक्या स्वरूपाचा करंट लागून सायरन वाजतो.करंट लागल्यामुळे व त्याचवेळी वाजलेल्या सायरनमुळे बिबट्या त्या ठिकाणाहून पळून जातो.सध्या जुन्नर तालुक्यात ६ आणि शिरूर तालुक्यात ४ शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण करण्यात आले आहे.या शेतकऱ्यांना या सौर कुंपणाचा चांगला फायदा होत असून सौर कुंपण केल्यापासून बिबट्या त्या घराकडे अद्याप एकदाही फिरकला नाही.

जुन्नर वनविभागामार्फत जुन्नर तालुक्यातील ४००, शिरूर तालुक्यातील २०० , आंबेगाव तालुक्यातील ६० शेतकऱ्यांची या सौर कुंपण योजनेसाठी निवड करण्यात आली असून पुढील काळात या शेतकऱ्यांना सौर कुंपण दिले जाणार आहे.या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १५० लक्ष रुपये एवढ्या रक्कमेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.त्यामध्ये २२ हजार ५०० रुपये प्रति लाभार्थी नुसार खालीलप्रमाणे एकूण ६६० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

घराभोवतीचा साधारण अर्धा एकर परिसर या सौर कुंपणाद्वारे बंदिस्त करता येणार आहे.एका सौर कुंपणासाठी ३० हजार रुपये खर्च येतो.यापैकी शासन ७५ टक्के खर्च करणार असून २५ टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याने करायचा आहे.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ ही नावीन्यपूर्ण योजना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे.

आतापर्यंत लाभार्थी हिस्स्याची प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये रक्कम भरलेल्या जुन्नर तालुक्यातील ६ आणि शिरूर तालुक्यातील ४ अशा एकूण १० घरमालकांना याचा लाभ देण्यात आला आहे.

या सौर कुंपणामुळे एका घराभोवतीचा साधारण अर्धा एकर परिसर नियंत्रित करता येणार आहे.एका सौर कुंपणासाठी ३० हजार रुपये खर्च येतो.यापैकी शासन ७५ टक्के खर्च करणार असून २५ टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याने करायचा आहे.

“बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे सौर कुंपण अत्यंत प्रभावशाली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण केले आहे त्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे.अतिसंवेदनशील भागातील बिबट हल्ल्याचा संभाव्य धोका आणि जीवितहानी टाळण्यासाठी एकांतात असलेल्या जास्तीत जास्त घरमालकांनी हे कुंपण तातडीने करून घेणे आवश्यक आहे.” – अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर

“बिबट्याने आमच्या घराजवळ येऊन आमच्या पाळीव कुत्र्यांना ठार केले आहे.सौर कुंपणाचा करंट लागल्यापासून बिबट्या पुन्हा आमच्या घराकडे आला नाही.इतर वन्यजीवांपासून देखील या सौर कुंपणामुळे संरक्षण होत आहे.इतर शेतकऱ्यांनी देखील हे सौर कुंपण करून घ्यावे.” – सागर मोरे, शेतकरी, शिरोली खुर्द (जुन्नर)