May 15, 2025

मौसम: रसाळ आंब्याचा…

राजेश घोडके
पुणे, २६ मार्च २०२५: पुण्याच्या बाजारात दरवर्षी एक विशेष आणि आवडीचा मौसम येतो तो म्हणजे अर्थातच आंब्यांचा! हा ‘किंग ऑफ फ्रूट्स’ पुणेकरांच्या हृदयाला आनंद देतो. पुणेकरांच्या मनात विशेषतः देवगड आल्फोन्सो ज्याला आपण हापूस म्हणतो आणि रत्नागिरी आंबे या दोन आंब्यांना अनोखं स्थान आहे. कोकणाच्या किनाऱ्यांवर उगवणारे हे आंबे त्यांच्या स्वाद, सुगंध आणि विशिष्टतेसाठी प्रसिद्ध आहेत. जगभर आणि पुण्यातील बाजारांमध्ये त्यांची मागणी खूप मोठी असते आणि आंब्याच्या हंगामात पुणेकरांना त्यांचा अनोखा स्वाद एक अविस्मरणीय अनुभव देतो,

चवीला उत्कृष्ट असा आल्फोन्सो आंबा त्याची खासियत त्याच्या जास्त गर (क्रीमी टेक्स्चर), गोड चव आणि अप्रतिम सुगंधात आहे. देवगडच्या किनाऱ्यांवर उगवणारे आल्फोन्सो आंबे त्यांच्या विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहेत. आकाराने छोटे असले तरी त्याची गोडी मोहात पाडेल अशी आहे. पुण्यातील ग्राहक पेठ व इतर परिसरातील बाजारांमध्ये देवगड आल्फोन्सो आंब्याची मागणी आणि विक्री फेब्रुवारी शेवच्या हप्त्या पासून चालू झाली आहे.

लोक त्याच्या रसाळ गोड चवीसाठी त्याला पसंती देतात. जरी या आंब्यांची किंमत जास्त असली तरी त्याची चव हे त्याचं प्रमुख मागणी आहे. महत्वाचं म्हणजे आंबा कापला की आतून पूर्ण केशरी असेल तर त्याची ओळख पटते म्हणजे तो हापूस आहे. तसंच रत्नागिरी आंब्याच आहे, पण देवगड आणि रत्नागिरी म्हणून इतर राज्यात हापूस आंब्याच्या पेटीत कर्नाटकी आंबा पॅक करून विकला जातो, तो कापला तर आतून पिवळा निघाला तर खरा देवगड/रत्नागिरी नाही, असं एक स्थानिक आंब्याचे विक्रेते जितुराज कांबळे यांनी सांगितले.

साधारण मौसमाच्या सुरवातीला १८०० ते २००० हजार रुपये प्रति डझन नग असा भाव राहतो. जसा-जसा बाजारात माल दाखल होतो, तशी मागणी असतेच पण दर कमी होतात.मौसमच्या मध्यंतरी बाजाराभाव १२०० ते १४०० रुपये मिळतो,शेवटी ९०० ते १००० असतो, या व्यतिरिक्त आमच्या कडे पायरी आंबे विक्रीसाठी असतात ग्राहक पेठ पुण्यातील विक्रेते काळुराम घाडगे यांनी सांगितले.

देवगड आल्फोन्सो आंब्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषतः अमेरिकेसारख्या देशांमध्ये आणि युरोपमध्ये या आंब्यांना प्रचंड मागणी आहे. आल्फोन्सो आंबे भारताबाहेरही लोकप्रिय आहेत.एप्रिलपासून जून पर्यंत सुरू होतो. या आंब्यांचा आकार जास्त मोठा नसतो, परदेशी लोक त्याच्या चवीला विशेष मानतात. असे विशाल पुण्यातील व्यावसायिक विशाल देशमुख म्हणाले.

देवगड व रत्नागिरी आंबा देखील पुण्यात व इतर राज्यात अत्यंत लोकप्रिय आहे. रत्नागिरीच्या कोकण भागातील आंबे चवीला उत्कृष्ट आणि किफायतशीर असतात. त्याची गोड आणि आंबटपणाची सांगड लोकांना विशेष आकर्षित करते. रत्नागिरी आंब्याला एक वेगळा स्पेशल टच आहे, कारण त्याच्या चवीत गोडपणासोबत एक ताजेपण आणि ताज्या फळांचा स्वाद असतो. आमच्या उन्हाळी वातावरणात थंडगोडपणा येतो आम्ही आनंद घेतो, असे मत गृहिणी कल्पना जोशी यांनी मांडले.

आंब्यांच्या हंगामात पुण्यातल्या बाजारात फिरताना, तुम्हाला देवगड आल्फोन्सो (हापूस)आणि रत्नागिरी आंब्यांचा अनुभव चुकवता येणार नाही. हे दोन्ही आंबे तुमच्या ओठांवर एक अमिट छाप सोडतील. पुण्यातील प्रत्येक आंब्याच्या शौकिनासाठी हा मौसम महत्वाचं ठरतो.