May 15, 2025

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव सेनेचा पुण्यात आक्रमक मोर्चा; पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे, २३ एप्रिल २०२५: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहरात आक्रमक झाली. या हल्ल्यात २८ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर निष्क्रिय केंद्र सरकारवर टीका करत शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

पुण्यात झालेल्या या निदर्शना दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी “गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या” अशा घोषणा देत संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी सांगितले की, देशात पठाणकोट, उरी, पुलवामा आणि आता पहलगामसारखे हल्ले सतत घडत असताना सरकार नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. जर भारतात भारतीय सुरक्षित नाहीत आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांचा येथे विशेष सन्मान व सुरक्षितता दिली जात असेल, तर हे सरकार असमर्थ असून राजीनामा देणेच योग्य ठरेल.

या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, राम थरकुडे, प्रशांत राणे, अनंत घरत यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची व युवासेनेची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त झाला असून, सोशल मीडियावरही या निषेधाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.