पुणे, २८ एप्रिल २०२५ : पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा संताप आज उफाळून आला. पुरंदर तालुक्यातील सात गावांतील हजारो शेतकऱ्यांनी अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढत, “विमानतळ आमच्या प्रेतावर होईल” असा इशारा दिला.
शासनाकडून पुरंदर विमानतळाच्या कामाची हालचाल सुरू झाली असून, संवाद व भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळाली आहे. मात्र, या सातही गावांतील ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींनी यापूर्वीच विमानतळास विरोध दर्शवणारे ठराव मंजूर केले आहेत. शासनाने तो नजरअंदाज केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“आमच्या जमिनी घेऊन आमचं अस्तित्व संपवलं जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी वर्ग उध्वस्त होईल, पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात येईल,” असा आक्रोश आंदोलक शेतकऱ्यांनी केला. प्रशासनाच्या कारवाईमुळे मानसिक तणावाखाली वावरणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटनाही यावेळी समोर आली. “ड्रोन सर्वेक्षण व जमीन मोजणीचे काम त्वरित थांबवावे, अन्यथा आणखी शेतकरी आत्महत्या करू शकतात,” असा इशाराही आंदोलकांनी दिला.
शेतकऱ्यांनी यावेळी शासनावर ताशेरे ओढत म्हटलं की, “फक्त पैशाच्या मोबदल्यात आमचं जीवन उद्ध्वस्त केलं जात आहे. सरकार जनतेचे जीवन सुखी करण्याऐवजी त्रास देत आहे. आमचं पर्यावरण, संस्कृती आणि भौगोलिक समतोल धोक्यात येणार आहे.”
या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारकडे एकच मागणी केली — “आमचं जगणं हिरावून घेऊ नका. पुरंदर विमानतळ प्रकल्प तत्काळ रद्द करा.”
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार