May 13, 2025

पुणे शहराला मिळणार १ हजार ई-बस – मोहोळ यांचा केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्याकडे प्रस्ताव

पुणे, १५ आॅक्टोबर २०२४: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेऊन मतदारांची मते मिळवण्याचा चंग बांधलेला आहे. असे असताना पुण्यासाठी देखील महत्त्वाची बातमी समोर येत असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेऊन पुणे शहरासाठी एक हजार इ बसची मागणी केलेली आहे.

शहरात मेट्रोचं जाळं विस्तारत असताना पीएमपीएमएलचं सक्षमीकरण करण्यावर आपला भर असून पीएमपीएमएलसाठी मोदी सरकारच्या माध्यमातून १ हजार नव्या ई-बस मिळाव्यात, या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांना दिला. शिवाय या प्रस्तावासंदर्भात पुणे शहरातील बसेसची आताची संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज, यासंदर्भात चर्चा केली. यावर देवीगौडांनी या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ साली देशात आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्यानंतर पुणे शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हायला सुरुवात झाली.

मोदी यांच्या नेतृत्वात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर वनाज ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट हे ३३ किलोमीटरचे दोन मार्ग १०० टक्के कार्यान्वित करत हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या कामाचाही शुभारंभ केला. तसेच नुकतेच स्वारगेट-कात्रज या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन झाले असून खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन टप्प्यांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

एकीकडे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरणही मोदी सरकारच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर पुणे शहराला मोदी सरकारच्या माध्यमातून ई-बसेस प्राप्त झाल्या. आजवर ४५० हून अधिक ई-बसेस मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला मिळाल्या आहेत.

मेट्रोचे जाळे भक्कम होत असताना पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढावी आणि पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी सहज, सुलभ आणि वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या १ हजार ई-बसेसचा प्रस्ताव दिला आहे. मला विश्वास आहे, या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही होऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले.