July 27, 2024

पुणे: बालसुधार गृहातून कोयता टोळीतील चार मुलांचे पलायन

पुणे, १९/०४/२०२३: वेगवेगळ्या गुन्ह्यात बालसुधार गृहात बंदिस्त असलेल्या कोयता टोळीतील चार विधीसंघार्शित बालकांनी सुधारगृहात झालेल्या भांडणाच्या गोंधळाचा फायदा घेत, लाकडी शिडी सुरक्षा भिंतीला लावून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याबाबत सुमंत अशोक जाधव (वय- 41 ,रा. इंदिरानगर, बिबेवाडी, पुणे) यांनी  नऊ अल्पवयीन आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 18 एप्रिल रोजी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृह येरवडा याठिकाणी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुमंत जाधव हे येरवडेतील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृह काम करत आहे. सदर संस्थेतील विधी संघार्शित बालकांमध्ये आपसात झालेल्या भांडणांमध्ये आरोपींनी दोन बालकांना शिवीगाळ करून, दगड मारून खिडकीचे नुकसान केले.त्यानंतर सदर ठिकाणी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन चार आरोपींनी लाकडी शिडी सुरक्षा भिंतीला लावून पळून गेले आहेत. याबाबतची माहिती होताच, बालनिरीक्षण गृहातर्फे येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस पाटील पुढील तपास करत आहेत.