पिंपरी, १४ जून २०२५: संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी भक्ती-शक्ती चौकात १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी शहरात दाखल होणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून त्याचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी विठ्ठल मंदीराचे विश्वस्त तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, देवन्ना गट्टूवार,नितीन देशमुख, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वैशाली ननावरे, नितीन देशमुख,शिवाजी वाडकर, संतोष दुर्गे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे,सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे तसेच पोलीस निरीक्षक बापू डेरे, भोजराज मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले,पालखी मार्गावर अडथळा होणार नाही याबाबत पोलिसांनी खात्री करून परवानगी दिल्यानंतर महापालिका परवानगी देण्याचा निर्णय घेईल.रस्त्यांची डागडूजी, विद्युत विभागाची कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. पालखी मार्गावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात यावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे. तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आषाढीवारी पालखीने पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर निगडी येथील भक्ती शक्ती येथे सर्व वारकरी बांधव तसेच विश्वस्त आणि दिंडीप्रमुख यांचे महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारा स्वागत कक्ष तसेच करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहितीही पाहणी दौऱ्याच्या वेळी आयुक्त सिंह यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. या ठिकाणची देखील त्यांनी पाहणी करत माहिती घेतली. याशिवाय खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा माळ परिसर, काळभोर नगर यासह पालखी मुक्कामाचे ठिकाण येथे पाहणी करून आयुक्त सिंह यांनी आढावा घेतला.

More Stories
हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी एसआयटी स्थापन; मुख्यमंत्र्यांचे आदेश
PCMC: शहराच्या दररोज पाणीपुरवठ्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज : राहुल कलाटे
निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद…