पुणे, ०१/०४/२०२४: कर्जाची रक्कम परत केलेली असतानाही लाखो रुपये मागून त्यापोटी घर नावावर करण्यासाठी जबरदस्तीने अपहरण करून खंडणी वसूल करण्याबरोबर तसेच वकिलाच्या कार्यालयात नेऊन सह्या घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब गायकवाड टोळीतील सदस्य सचिन गोविंद वाळके आणि संदीप गोविंद वाळके या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी फेटाळला. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतरही, न्यायाधीशांनी आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाजावर होणारा परिणाम लक्षात घेत आरोप गंभीर असल्याचे सांगत जामीन नाकारला. फिर्यादी यांच्या वतीने सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी कामकाज पाहिले. तर अॅड. हृषिकेश धुमाळ यांनी फिर्यादींच्या वतीने सरकारी वकिलांना सहकार्य केले.
न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली ज्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा विचार केला गेला. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेत, सचिन वाळके याच्यावर यापूर्वी शारीरिक हानी आणि मालमत्तेशी संबंधित नऊ गुन्हे दाखल असून संदीपवर देखील अनेक गुन्हे असल्याची नोंद घेण्यात आली. याशिवाय, आरोपींनी केलेल्या अपहरण, खंडणी आणि कर्जाच्या वादाशी संबंधित धमक्यांच्या आरोपांचा न्यायाधीशांनी विचार केला. या तथ्यांच्या आधारे, कथित गुन्ह्यांच्या सामाजिक परिणामासह, न्यायाधीशांनी असा निष्कर्ष काढला की हि केस जामिनासाठी योग्य नाही आणि म्हणून अर्ज फेटाळला.
याबाबत महेश पोपट काटे (वय ४०, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी नानासाहेब शंकर गायकवाड, केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), सचिन गोविंद वाळके (रा. विधातेवस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख), संदीप गोविंद वाळके (रा.विधाते वस्ती, बाणेर) यांच्यावर अपहरणासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी काटे यांनी आरोपी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे काटे यांनी परत केले असताना देखील आणखी ८० ते ८५ लाख रुपये मिळवण्यासाठी आरोपींनी पिंपळे सौदागर येथील जमीन व घर नावावर करून दे, असे म्हणून वेळोवेळी धमकी दिली. तसेच काटे यांना त्यांच्या घरातून कागदपत्रासह सचिन वाळके, संदीप वाळके यांनी आणलेल्या फॉर्च्यूनर कारमधून बळजबरीने बसवून अॅड. चंद्रकांत नाणेकर यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे काटे यांना शिवीगाळ करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करून आरोपींनी बनवलेल्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या. नानासाहेब गायकवाड आणि साथीदारांवर आतापर्यंत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आतापर्यंत या दोन्ही कुटुंबावर तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद झालेली.
More Stories
पुणे: अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायोवर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली
पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्ष स्थापन
राहुल गांधी यांची शुक्रवारी पुण्यात सभा