May 19, 2024

पुण्यात 11 मार्च 2023 रोजी चौथी वाय20 विचारविनिमय बैठक होणार

पुणे, 09 मार्च 2023: पुण्यात लव्हाळे येथे 11 मार्च 2023 रोजी सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) विद्यापीठाच्या प्रांगणात युवा 20 (वाय20) विचारविनिमय बैठक होणार आहे. केन्द्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर प्रमुख पाहुणे असतील तर स्ट्रॅटेजिक फोरसाइट समूहाचे अध्यक्ष डॉ. संदीप वासलेकर उद्घाटन समारंभाचे बीजभाषण करतील. शनिवारी 11 मार्च 2023 रोजी सकाळी 11:45 वाजता विचारविनिमय बैठकीचे उद्घाटन होईल.

सर्व जी20 सदस्य देशांतील तरुणांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी युवा 20 (वाय20) हा एक अधिकृत विचारमंच आहे. ‘शांतता निर्माण आणि सलोखा: युद्ध विरहित युगाची सुरुवात- वसुधैव कुटुंबकमचे तत्त्वज्ञान’ ही या वाय20 बैठकीची संकल्पना आहे. भारतातील विवादांचे निराकरण, हवामान विषयक कृती, लिंगभाव आधारित वाद आणि सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, सामाजिक बदलासाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा तसेच कामाचे भविष्य यासाठी ‘विकासाचे राजकारण’ या विचारमंथनाच्या सहा उप संकल्पना आहेत.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील युवक या बैठकीत वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. स्त्री-पुरुष समानता, मानवाधिकाराचा पुरस्कार, युनेस्को एसडीजी4 युथ नेटवर्कवर शिक्षण परिवर्तनासाठी प्रतिनिधित्व, लोकशाही नेतृत्वाद्वारे समुदाय निर्माण करण्यासाठी समर्पित युवक, शांतता निर्माणासाठी कायदेशीर सुधारणा या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय या सर्वांनी कार्य केले आहे. प्रेक्षकांमध्ये युवा प्रतिनिधी, स्पर्धेतील विजेते, निमंत्रित आणि भारत आणि जी20 देशांतील विद्यार्थी यांचा समावेश असेल. या विचारमंथनांद्वारे, तरुणांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारे नवीन ज्ञानाची निर्मिती, 21व्या शतकातील कौशल्यांचा विकास आणि संशोधन तसेच नवोन्मेष याद्वारेच नव्हे तर आपल्या वसुंधरेला आणि मानवतेला भेडसावणाऱ्या अनेक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल तसेच मानवकेन्द्रीत जागतिकीकरणाचे मानदंड घडतील अशी एसआययूला आशा आहे.

मुख्य कार्यक्रमा व्यतिरिक्त लव्हाळे येथील एसआययू प्रांगणात 10 मार्च रोजी विविध कार्यक्रम होतील. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, सिम्बायोसिस कला गृहाद्वारे स्थानिक कलावंताचे सादरीकरण आणि भारतीय हस्तकलेचे प्रदर्शन करण्यासाठी आदर्श गाव, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन यांचा यात समावेश असेल.

वाय-20 विचारविनिमय बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लव्हाळे येथील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या प्रांगणात 9 आणि 10 मार्च 2023 रोजी ही दोन दिवसीय कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत 18 ते 35 वयोगटातील पंचवीस महिलांना राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे संचालक के. श्रीधर अय्यंगार हे संस्थेच्या तज्ञ चमूसह मार्गदर्शन करतील. सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाने त्यांच्या आउटरीच कार्यक्रमांतर्गत दत्तक घेतलेल्या या लाभार्थी तरुणी पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातील आहेत.

भित्तीपत्रक स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, महिला सक्षमीकरण, आपत्ती आणि संकट व्यवस्थापन, हरित विकास आणि हवामान इत्यादी विषयांवर एमयूएन स्पर्धा आयोजित केली आहे. यात विविध गटातील तरुण सहभागी होतील.

जागतिक समस्यांबद्दल जागृती, विचारांची देवाणघेवाण, वादसंवाद, वाटाघाटी आणि सहमती अशा विविध उपक्रमांसाठी सर्व जी20 सदस्य देशांमधील तरुणांकरता वाय20 हा अधिकृत विचारमंच आहे. तो तरुणांना भविष्यातील नेतृत्व म्हणून घडवण्यासाठी काम करतोय.

युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी जी20 चे यजमान अध्यक्ष घेतात. सामान्यत: पारंपारिक मंचाच्या काही आठवड्यांपूर्वी याचे आयोजन केले जाते. युवक काय विचार करीत आहेत हे यात जाणून घेतले जाते. जी 20 शासन आणि तेथील स्थानिक तरुण यांच्यात दुवा सांधण्याचा हा प्रयत्न आहे. 2023 मधील वाय-20 भारत परिषद भारताच्या युवा-केंद्रित प्रयत्नांचा प्रत्यय देईल. ती जगभरातील तरुणांना त्याची मूल्ये आणि धोरणात्मक उपाययोजना दाखवण्याची संधी देईल.

भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळातील वाय -20 बद्दल इथे अधिक जाणून घ्या.

जी20 किंवा ग्रुप ऑफ ट्वेंटी हा 19 देश आणि युरोपियन युनियनचा समावेश असलेला आंतरसरकारी मंच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जी 20 कार्य करतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता, हवामान बदल कमी करणे आणि शाश्वत विकास यांचा यात समावेश आहे.

येथे क्लिक करून जी-20 बद्दल अधिक जाणून घेता येईल.

भारताने या वर्षी 1 डिसेंबर रोजी इंडोनेशियाकडून जी20 अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आणि 2023 मध्ये देशात प्रथमच जी20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली जात आहे. भारत, लोकशाही आणि बहुपक्षीयत्वासाठी मनापासून वचनबद्ध आहे. जी20 अध्यक्षपद भारतासाठी एक एक ऐतिहासिक क्षण आहे. इतिहास, सर्वांच्या हितासाठी व्यावहारिक वैश्विक उपाय शोधून महत्त्वाची भूमिका बजावू पाहतो आणि असे करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग एक कुटुंब आहे’ची खरी भावना प्रकट करतो.