पुणे, १५ जून २०२६: “स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने सन २०४७ मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे, त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे. भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान अत्यंत भक्कम केले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमानसेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त (१२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीण (उत्तर) चे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) चे अध्यक्ष शेखर वढणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, २०१४ मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले. १० जून २०२६ रोजी सलग ४,९९३ दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे. मागील १२ वर्षांत सरकारने केलेली अभूतपूर्व विकासकामे घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत.
मोदी सरकारच्या १२ वर्षांतील प्रमुख उपलब्धी:
भारताची अर्थव्यवस्था पूर्वी जगामध्ये ११ व्या स्थानावर होती, ती आता थेट ४ थ्या स्थानावर पोहोचली आहे. यूपीए सरकारच्या काळात महागाईचा सरासरी दर १० टक्के होता, तर मोदी सरकारच्या काळात तो सरासरी ५.१ टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात सरकारला यश आले आहे.
देशातील सुमारे २५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली आहे. विविध कल्याणकारी योजनांमुळे देशातील ५० टक्के जनता थेट शासकीय योजनांची लाभार्थी बनली असून, ८० टक्के जनतेला मोफत धान्य पुरवले जात आहे.
काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराला आळा घालत मोदी सरकारने थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून तब्बल ५१ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.
देशात पूर्वी राष्ट्रीय महामार्ग उभारणीचा दर प्रतिदिन ११ किमी होता, तो आता दररोज ३४ किमी इतका वाढला आहे. रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण, वंदे भारत ट्रेनचा विस्तार आणि पायाभूत भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे.
देशातील ५ शहरांमधील २४८ किमीचा मेट्रो मार्ग आता २३ शहरांमध्ये १ हजार ९३ किमीपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.
१२ वर्षांपूर्वी देशात केवळ ७४ विमानतळे कार्यरत होती, आज त्यांची संख्या १६५ वर पोहोचली आहे. ‘उडान’ योजनेचा १.५ कोटी प्रवाशांनी लाभ घेतला असून, स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळण्यासाठी ‘उडान कॅफे’ सुरू करण्यात आले आहेत. उडान २.० अंतर्गत आणखी १२० नवीन स्थानांवरून सुमारे ४ कोटी प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.
जनधन योजनेंतर्गत देशात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारताने जगात क्रांती घडवून आणली असून जगातील सर्वाधिक आर्थिक व्यवहार आज भारतात होत आहेत.

More Stories
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती
आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले- गणेश बिडकर यांची घोषणा
Pune: पाणी कपात सुरू, पहिल्या दिवशी किरकोळ तक्रारी