March 28, 2024

व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात – शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

पुणे, ०४/०६/२०२३: व्यंगचित्र हे समाजप्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे. एका व्यंगचित्रामध्ये खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून दुखऱ्या, बोचऱ्या गोष्टी हसतखेळत मार्मिक पद्धतीने अगदी सहजतेने समाजापर्यंत पोहोचवता येतात, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, अमित पापळ यांनी केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे सचिव मकरंद पेटकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसाद चावरे, गणेश वायाळ, नंदू येवले, नितीन रावळ, संजय साळवी, मनीष घरत,राजेश शेलार, दिनेश पोटे, गणपत साळुंखे, दिलीप पोमन, प्रकाश चव्हाण, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, धनराज गरड, अमित पापळ आदी यावेळी उपस्थित होते.