पुणे, २३ जुलै २०२५ ः पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धायरी फाटा ते रायकर मळा या मार्गावर दररोज जड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी, नागरिक तासन्तास रस्त्यावर अडकून राहतात. विशेष म्हणजे, या समस्येवर वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या मार्गावर जड वाहने दिवसभर सर्रासपणे धावतात. या वाहतुकीसाठी कोणतेही पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळकरी मुले आणि नोकरदार वर्ग यांना रोजच वेळेआधी घर सोडावे लागते, तरीदेखील वेळेवर शाळा किंवा कामावर पोहोचणे अशक्य होते. अनेक वेळा नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत थांबावे लागते.
दरम्यान वाहतूक विभागाद्वारे अशा जड वाहनांवर कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. ना वेळेचे बंधन, ना वाहतूक नियंत्रण – परिणामी नागरिकांना रोजच्या जीवनात त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा एकच सवाल आहे –
“वाहतूक विभाग जड वाहतुकीवर कारवाई कधी करणार?” प्रशासनाकडून या भागातील वाहतूक समस्या गांभीर्याने घेतली जावी आणि जड वाहनांना नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नागरिकांची तीव्र मागणी आहे.

More Stories
पुणे : महिला दिनापासून पुणे मेट्रोमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न