May 3, 2024

मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल – चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १४ सप्टेंबर, २०२३ : ब्रिटीशांनी त्यांची भारतातील प्रशासकीय कामे करण्यासाठी माणसे तयार व्हावीत, या हेतूने भारतीयांना शिक्षण दिले. स्वातंत्र्यानंतर ही शिक्षणपद्धती बदलणे अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही. आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर मातृभाषेतील शिक्षणाला पुन्हा एकदा केंद्र सरकारने महत्त्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी टेक) यांच्या वतीने आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांना ‘सीओईपी अभिमान पुरस्कार २०२३’ देत आज गौरविण्यात आले त्यावेळी पाटील बोलत होते. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सीओईपी टेकच्या  मुख्य सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष होते. शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी, कुलगुरू प्रो एस डी आगाशे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, मानद सचिव डॉ सुजित परदेशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेले सीओईपी अभिमान पुरस्कार हे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुदळे, अनंत डिफेन्स सिस्टिम्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक चेतन धारिया, इंडिया इलेमेंट सोल्युशन्स व कूकसन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ रवी भटकळ, बंगळूरच्या एरोनॉटिकल डेव्हलमेंट एजन्सीचे शास्त्रज्ञ डॉ विजय पटेल, अमेरिकेतील नीअर यु सर्व्हिसेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष अचलेरकर आदींना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मागील राज्य सरकारने ३३ महिन्याच्या कार्यकाळात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत असहकार पुकारला होता, मात्र आता मागील एक वर्षाच्या काळात आमच्या सरकारने यामध्ये काम सुरु केले आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी बरोबरच विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम हे मातृभाषेत भाषांतरीत केले गेले आहेत. एआयसीटी आणि आयआयटी मुंबई यांचे विशेष सहकार्य यासाठी मिळाले. आता पॉलिटेक्निकचे ६५% विद्यार्थी हे मातृभाषेतून उत्तरपत्रिका लिहिता यावी यासाठी परवानगी मागत आहेत. मातृभाषेतील शिक्षणाने संकल्पना अधिक स्पष्ट होऊन नवकल्पना आणि संशोधनवृत्ती वाढीस लागेल आणि याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच देशालाही होईल.” नजीकच्या भविष्यात आयआयटी मुंबईच्या मदतीने राज्य सरकार इंग्रजी भाषेत बोललेले मराठी भाषेत भाषांतरीत करणारे तंत्रज्ञान विकसित करीत असून याद्वारे अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील असेही पाटील यांनी सांगितले. व्यवसायाभिमुख शिक्षणावर नव्या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

नवकल्पना, संशोधन आणि विकास-केंद्रित दृष्टीकोन देशाला कशा प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतो याचे उदाहरण देताना पाटील म्हणाले की,  “कोविड काळात स्वदेशी लस असल्याने आपल्या नागरिकांचे कमी खर्चात लसीकरण करण्यास मदत झालीच शिवाय ६० हून अधिक देशांना भारताने मोफत लस दिल्याने त्यांसोबत संबंधही जोडले गेले. मुळात एखाद्याची मदत करण्याचे संस्कार आपल्याला आपली संस्कृती शिकविते आणि हेच आपले तत्वज्ञान देखील आहे.”

एकेकाळी कोणत्याही संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी साधा स्क्रू देखील आपल्याला आयात करावा लागत होता. आज आपला देश १ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांचे उत्पादन तर करतोच याबरोबरच त्यातील १६ हजार कोटी रुपयांची उत्पादने ही निर्यात होतात, असेही पाटील यांनी नमूद केले. राज्य सरकारकडून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नवीन नियामक मंडळाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

संस्थेच्या चिखली येथील परिसरात नवीन इमारती, संशोधन व इनोव्हेशन पार्क विकसित होत असल्याची माहिती देत डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पना यांवर भर देऊन उद्योजकते संबंधित मार्गदर्शनासाठी आम्हाला मदत करावी. तुमच्या ‘वॉलेट शेअर’ पेक्षा ‘माइंड शेअर’ आम्हाला जास्त मोलाचा वाटतो.” सीओईपीला आयआयटी मुंबईच्या मानकांच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाचा पुनरुच्चार यावेळी डॉ चौधरी यांनी केला.

माजी विद्यार्थ्यांचे संस्थेशी भावनिक नाते जोडलेले असून सीओईपीचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. जलदीप दौलत यांच्या वडीलांनी आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यात असलेली १.१ कोटी रुपये इतकी रक्कम आम्हाला देऊ केली आहे. या देणगीद्वारे आम्ही एआर- व्हीआर (ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी) प्रयोगशाळा उभारीत आहोत. माजी विद्यार्थ्यांनी सहा महिन्याच्या सेमिस्टरमध्ये किमान २ तास संस्थेला देत विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, उद्योजकता आदी विषयांवर मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा प्रो एस डी आगाशे यांनी व्यक्त केली.

पुरस्कार्थींच्या वतीने विवेक फणसळकर आणि आशिष अचलेरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर डॉ विजय पटेल यांनी तेजस या स्वदेशी हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील  विमानाची प्रतिकृती संस्थेला भेट म्हणून दिली. यावेळी बोलताना  फणसळकर म्हणाले की, आज ३७ वर्षांनी मी सीओईपी मध्ये आलो आणि माझ्या विविध आठवणीना उजाळा मिळाला. आमच्या या महाविद्यालयात अभ्यासाबरोबरच खेळ व कलागुणांना देखील वाव दिला जात असे. मला आठवतंय की, त्यावेळी आम्ही कधीही इतर कोणत्याही महाविद्यालयाला पुरुषोत्तम किंवा फिरोदिया करंडक जिंकू दिला नाही. आमच्या वेळी सीओईपीचे कँटीन हे खूप काही चांगले नव्हते, आता त्यात बदल झाला असेल अशी माझी अपेक्षा आहे, नसेल तर माजी विद्यार्थी संघटना आणि कॉलेजने ते चांगले करावे असे  फणसळकर म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.         

प्रास्ताविक करताना भरत गीते यांनी संस्थेचा इतिहास, दैदिप्यमान परंपरा यांची माहिती दिली. नजीकच्या भविष्यात चिखली येथे साकारत असलेला संस्थेचा परिसर, नवीन वसतिगृहाची होत असलेली उभारणी, विद्यापीठाचे अमेरिकन आणि युरोपियन विद्यापीठांशी होत असलेले करार अशा योजना आदींची माहितीही दिली. आशिष अचलेरकर यांनी विद्यापीठाला दिलेल्या १० कोटी रुपयांच्या देणगीबद्दल, स्व. गौरी शाह यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या ५ कोटींच्या देणगीबद्दल त्यांचे आभार मानले. विद्यापीठात शिकत असलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ सुजित परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले तर पियुष गोरेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले