April 27, 2024

पुणे: शंभर पोलिस चौक्या अद्ययावत होणार – चंद्रकांत पाटील

पुणे, १३/०८/२०२३: पोलिस मित्र संघटनेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक शेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गील, डीजीपी एन. डी. पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक दीपक होमकर आदी मान्यवर उपस्थित होते. ही संघटना १९८७ सालापासून पोलिसांच्या सन्मान,अधिकारासाठी कार्यरत आहे.

या वेळी पत्रकार, समाजसेवक आणि पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या पोलिसांचे सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक दीपक होमकर, ‘लय भारी पुणेरी’च्या संचालिका रश्मी कालसेकर, स्पंदन बाल आश्रमाचे संचालक मनोज म्हस्के, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष चेतन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलीमा पवार, दत्तात्रय भापकर, गणेश माने, पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलिस हवालदार किरण लांडगे, पोलिस शिपाई आशय इंगवले, धनंजय पाटील, अमोल नजन, प्रदीप चव्हाण, वाहतूक शाखेच्या संध्या काळे तसेच दामिनी पथकाचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कपोते यांनी केले.राजेंद्र कपोते यांनी प्रास्ताविकात पोलिस मित्र संघटनेच्या स्थापनेची तसेच आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप साकोरे यांनी केले,यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले,’ पुणे पोलिसांनी अतिशय सावधगिरी आणि सतर्कता दाखवून अलिकडेच अतिरेक्यांना पकडल्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक होत आहे, कोयता गॅंन्गलाही पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे, अशा पोलिसांचा यथोचित सन्मान आज होतो आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, ‘पुण्यातील शंभर पोलिस चौक्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्णत्वास जाईल, जेणेकरून पोलिसांना आपले कर्तव्य आणि न्याय व्यवस्था अधिक सक्षमपणे राबवता येईल’