May 19, 2024

पुणे: येत्या संकष्टीला दगडूशेठ गणपतीला सह्याद्री फार्म्सतर्फे द्राक्षांची आरास

पुणे, १०/०३/२०२३: शंभर टक्के शेतकऱ्यांची मालकी असलेल्या नाशिक येथील ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ताज्या, रसायनमुक्त द्राक्षांची आरास केली जाणार आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त येत्या शनिवारी (ता.11) दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ही द्राक्षे अर्पण केली जातील. ही द्राक्षे नंतर भाविकांमध्ये, ससून रुग्णालयातील रुग्णांना, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

नाशिक येथील सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचा प्रसाद सलग दुसऱ्या वर्षी फाल्गुनातील संकष्टी चतुर्थीला 2 हजार किलो द्राक्षे नैवद्य आणि प्रसाद स्वरुपात दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यात येणार आहे. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्षशेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांच्या वतीने साकडे घालण्यात येणार असल्याचे सह्याद्री फार्म्सच्या वतीने सांगण्यात आले.

द्राक्षांचा प्रसाद कशासाठी?
प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात.