May 19, 2024

पर्यावरणासाठी महिलांचे योगदान महत्वाचे – डॉ. विनीता आपटे

पुणे, ०८/०३/२०२३: ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणा-या महिला खुप जास्त आहेत. वन खात्यासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत याचा विशेष अभिमान वाटतो. कचरा व्यवस्थापन करण्यात महिलाच आघाडीवर असतात. पृथ्वी वरचं पर्यावरण वाचवायचं असेल तर महिलांचे योगदान मह्त्वाचे आहे. पाण्याची बचत, विजेची बचत व स्वच्छता यासारख्या गोष्टी महिला प्रभावी पद्धतीने करु शकतात ‘, असे प्रतिपादन डॉ. विनीता आपटे ( संस्थापक, तेर पॉलिसी सेंटर ) यांनी केले.

महिला दिनानिमित्त प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी महिलांना पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्येक देशाला दोन पंख असतात ,एक स्त्री आणि एक पुरुष. साहजिकच देशाची उन्नती व्हायची असेल तर दोन्ही पंखांचा सन्मान होणं गरजेचं आहे. महिला आघाडीवर नाहीत असं आज एकही क्षेत्र नाही. अशा महिलानी इतरही महिलाना सक्षम बनवणं ही खरी गरज आहे.मी पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या अनेक महिला बघत असते . सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या यशस्वी महिलाना पुरुषी अहंकाराचा सामना करावाच लागतो .त्या शिवाय महिला सह्कारीपण अनेकदा दुस्वास करतात व त्यामूळे महिलांना दोन्ही आघाड्यांवर शत्रु निर्माण होतात. सकारात्मक वृत्ती, खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी महिलांनी आत्मसात कराव्यात. कुठ्ल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला स्वत:चा आत्मसन्मान जपावा व आत्मनिर्भर व्हावे असे नेहमीच वाटते, असे डॉ. आपटे यांनी म्हटले आहे.

*पर्यावरणप्रेमी प्रवास*

बँकेतील नोकरीचा अनुभव, आवड म्हणून अभिनय, सूत्रसंचालन अशी व्यवधाने असली तरी पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत असलेल्या जिव्हाळ्यातून डॉ. विनिता आपटे यांनी तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हॉयर्नमेंट) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्स एनव्हॉयर्नमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन पर्यावरण क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरू ठेवले. गेल्या 7 वर्षांमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे जतन करण्याचे काम त्यांच्या संस्थेने केले आहे. सध्या डोलवि, काराव , जांभळी, कोडीत, दांडेली , जुई या गावांमध्ये जवळपास 5000 पेक्षा जास्त कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळावे व तिथल्या जमिनीचा कस वाढावा म्हणुन 50000 फळझाडे शेतकर्‍यांना संस्थेने दिली. कोडीत मध्ये आदिवासी संग्रहालय सुरू करून तिथल्या युवकांना व महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या अनेक वाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

निसर्गाच्या संरक्षण आणि
संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे जतन तेवढेच आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी कामाला सुरुवात केली. वारजे परिसरातील टेकडीवर झाडे लावणे आणि जगवणे या कामात त्या सातत्याने योगदान देत आहेत. पर्यावरणाबाबत आस्था असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, मात्र त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. भारतात होणार असलेल्या G20 अंतर्गत civil20 मधल्या शाश्वत विकास व हवामान बदल या कृती समिती मध्ये त्या सहभागी असून त्यासाठी पुढील काही महिने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पर्यावरण जागृतीसाठी तेर ऑलिम्पियाड, एन्व्हायरॉथॉन यासारख्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जाते.पर्यावरण पत्रकारिता आणि असे अनेक पुरस्कार दिले जातात.