पुणे, १२ जून २०२५: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुका ४ सप्टेंबरनंतर कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ४ सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करून ती अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळेल.
राज्यभरातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. प्रभाग रचना ही निवडणुकीपूर्वीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, पक्षांचे गटबाजी, उमेदवारांची शर्यत यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

More Stories
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द