पुणे, १५ सप्टेंबर २०२६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत विविध प्रकारच्या ३७ हजार ६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित तसेच प्रिलिटिगेशन स्वरूपातील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, बँक वसुली, भूमिसंपादन, वीजबिल आदी विविध स्वरूपाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
लोकअदालतीसाठी एकूण २ लाख ५९ हजार ३५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३७ हजार ६८७ प्रकरणांचा परस्पर सामंजस्याने निपटारा करण्यात आला. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ८४ हजार ९२० प्रकरणांपैकी ७ हजार ७४४ प्रकरणे, तर प्रिलिटिगेशन स्वरूपातील १ लाख ७४ हजार ११५ प्रकरणांपैकी २९ हजार ९४३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.
लोकअदालतीच्या माध्यमातून संवाद आणि परस्पर तडजोडीच्या मार्गाने वाद मिटल्यामुळे पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची बचत झाली. तसेच कौटुंबिक, मालमत्ता आणि अन्य स्वरूपाच्या वादांमध्ये सलोखा राखण्यास मदत झाली.
या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी, वकील, बँका, विमा कंपन्या, विविध शासकीय विभाग तसेच पक्षकारांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

More Stories
भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
ओव्हरटेकवर गुन्हा, मग ताफ्यामुळे त्रासाचे काय? पुणेकरांचा मोहोळांना पुणेकरांचा सवाल
पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे येत्या २६ व २७ सप्टेंबरला यशदामध्ये आयोजन