July 27, 2024

पुणे: भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणाचा खून; आरोपींना अटक, युनीट चारची कामगिरी

पुणे, दि. १३/०४/२०२३: भांडण सोडविल्याच्या गैरसमुजीतून तरुणावर वार करुन पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेचे युनीट चारने अटक केली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे टोळक्याविरुद्ध खूनाचा गुन्हा कमलांची वाढ पोलिसांनी केली आहे.

शंतनु शिवराज चाटे (वय १९  रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.  दिलीप बाबुराव हांगे (रा. साई पार्क सोसायटी, आळंदी) हा पसार आहे. अमितकुमार विश्वकर्मा (वय २१, रा. लोहगाव ) असे खून केलेल्याचे नाव आहे.

लोहगावमध्ये ७ एप्रिलला अमितकुमार रस्त्याने चालला होता. त्यावेळी  एमआयटी कॉलेजच्या समोर वडगांव-शिंदे रस्त्यावर चार- पाचजण भांडण करीत होती. त्यामुळे अमितकुमार घाबरुन पळून जात असताना शंतनू आणि इतरांना त्याने भांडण सोडविल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे टोळक्याने पाठलाग करुन अडवून अमितकुमार याच्यावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी  तरुणावर वार करणारे लोहगाव परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अमलदार स्वप्नील कांबळे आणि विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी  अमितकुमार विश्वकर्मा याने गाडी आडवी मारल्यामुळे वार केल्याची कबुली दिली.

गंभीररित्या जखमी झालेला अमितकुमार उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला. त्यामुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा कलमांची वाढ केली. आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त  रितेश कुमार,  सह आयुक्त संदीप कर्णिक,  अपर आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे,  एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय  विकास जाधव,  संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे यांनी केली.