April 20, 2026

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

मुंबई, ३१ जानेवारी २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे साध्या आणि शोकमग्न वातावरणात झालेल्या समारंभात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पक्ष नेत्यांच्या मते, राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्या अचानक झालेल्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर राज्य सरकार आणि पक्ष संघटनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड-
यापूर्वी दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. कोणताही विरोध नोंदवला गेला नाही.

या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्य शासनातील कार्यकारी जबाबदारी स्वीकारली. विधिमंडळ परिसरात “अजित दादा अमर राहो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भावनिक वातावरणात आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

सामाजिक कार्यातून राजकारणात-
१८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यात जन्मलेल्या सुनेत्रा पवार या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्या ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. १९८० मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून काहीसा दूर राहून बारामती परिसरात शेती व सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणूक लढवली होती; त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकीय पटावर मोठी पोकळी निर्माण झाली. नेतृत्वात सातत्य राखण्यासाठी पक्षाने तातडीने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली.

त्यांच्या खात्यांचे वाटप अद्याप जाहीर झालेले नसून येत्या काही दिवसांत त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. शोककाळ सुरू असल्याने शपथविधी सोहळा मुद्दाम साध्या स्वरूपात पार पडला.