May 3, 2024

महिलांवर अत्याचार करणार्याला मोहोळ पाठीशी घालता – काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांची‌ टीका

पुणे, २२ एप्रिल २०२४: देशासाठी मेडल जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह‌ यांचा सत्कार करणारे मुरलीधर मोहोळ जर उद्या खासदार झाले‌ तर ते महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतील, अशी घाणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांनी केली.

पुण्याच्या काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोंढे बोलत होते, यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, वीरेंद्र किराड, प्रवक्ते गोपाल तिवारी, इंटकचे जिल्हाध्यक्ष बळीराम डोळे, हनुमंत पवार, अजित दरेकर आदि उपस्थित होते.

लोंढे पुढे म्हणाले की, मोहोळ यांना महापालिकेचे‌ स्थायी‌समिती अध्यक्षपद मिळाले, महापौर पद मिळाले, या काळात त्यांनी पुणेकरांसाठी काहीच केले नाही. त्यांच्या‌ काळातील समान पाणी पुरवठा योजनेचे काय झाले ? टक्केवारी न देणारा ठेकेदार मोहोळ यांना मिळाला नाही त्यामुळे जायकाचा पैसा दोन वेळा परत गेला. महिलांच्या सॅनेटरी नॅपकीन वाटपासाठी ठेकेदार मिळाला नाही. महापालिकेचा कारभार करताना पुणेकरांना सेवा सुविधा देण्यास भाजप आणि मोहोळ अपयशी ठरले आहेत. देशात दहा वर्षात काहीच न केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि अॅड. आसिम सरोदे यांच्यावर हल्ला करणा-यांमध्ये मोहोळ यांच्या पुतण्याचा समावेश होता, त्यामुळे ते खासदार झाल्यावर पुणेकर कसे सुरक्षित राहतील ? असा‌ सवालही लोंढे यांनी केला.

आमचे उमेदवार रविंद्र धंगेकर सर्वसामान्य जनतेशी जोडलेले आहेत, ते लोकांच्या हाकेला धावून जातात. त्यामुळे ते नक्की मोहोळ यांचा पराभव करतील. संविधानाची तोडफोड केली जात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद वापर करून राज्यपालांच्या मदतीने राजकीय अस्थिरता निर्माण केली जात आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करून मणिपूर, छत्तीसगड राज्य पेटवली. महिलांवरील अत्याचारात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. आरोपींना सोडण्यासाठी पुरावे नष्ट करत आहेत. मणिपूर मध्ये पोलिसांदेखत महिलांवर अत्याचार होत होते. मोदींचे १० साल अन्यायकाल ठरले आहेत. त्यामुळे देशामध्ये काँग्रेसची लाट असून पहिल्या टप्प्यात भापजचा पराभव दिसू लागला आहे. राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून नितीन गडकरी हे देखील पराभूत होतील.

आमच्याकडे कार्यक्रम आहे, निती आणि नियत आहे. याईलट १० वर्ष सत्ता भोगून ही मोदी महागाई, बेरोजगारी, शेतक-यांची कर्जमाफी याबद्दल ते चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील, तेवढ्या जास्त‌ जागा महाविकास आघाडी व इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या‌ समोर मुनगंटीवार बहिण भावाबद्दल अत्यंत गलिच्छ बोलले, ही त्यांची‌ संस्कृती आहे. आमच्या नेत्यांच्या सभांना चांगला‌ प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाळली, त्याचे उदाहरण कर्नाटक आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली का ? काहीही पाळले नाही. उलट वेदांत फॉक्सकॉन हा एक लाख रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प गुजरातला पळवला. तरीही राज्याच्या सत्तेतील एक फुल दोन हाफ गप्प बसले. फडणवीस हे फौजदारचे हवालदार झाले आहेत. अजित दादा यांच्या वाट्याला चार जागा आल्या, त्याही ते हरत आहेत. राज्यात गद्दारी विरुद्ध खुद्दारी लढत आहे. मतदान कमी का झालं याचा विचार भाजपने करावा. ही लढाई लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे, त्यामुळे जनता काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना निवडून देईल, असेही लोंढे म्हणाले.

म्हणून राज्यात पाच टप्प्यात निवडणुका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात‌ केलेल्या कारभारावर लोक नाराज आहेत. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास‌ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले आहे. राज्यात केलेल्या फोडाफोडीमुळे राज्यातल्या नेत्यांवर जनता प्रचंड चिडलेली आहे त्यामुळे पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रचार करायला भरपूर वेळ मिळावा म्हणूनच राज्यात पाच टप्प्यात निवडणूका घेतल्या का ? असा सवाल करून मोदीजी आठवड्यात दोन वेळा महाराष्ट्रात दोन वेळा येतात त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला पाठवलेले प्रकल्प परत कधी पाठवणार ते सांगावे. ७० हजार कोटींचा घोटाळा करणा-यांना कधी जेलमध्ये घालणार हेही सांगावे असे लोंढे म्हणाले.

पक्ष विरोधी कारवाया करणार्यांवर कारवाई
राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णया विरोधात बोलणारे आणि कृती‌ करणारे कोणीही असोत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे म्हणत लोंढे म्हणाले.