July 27, 2024

पुणे जिल्हा ई-चावडी प्रकल्पामध्ये अग्रक्रमावर ठेवावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, 03 मार्च 2023: पुणे जिल्ह्याने गेल्या दोन वर्षांत नोंदी निर्गती, ७/१२ विसंगती दुरुस्ती व तक्रार प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय कामगारी केली असून ई-चावडी प्रकल्पामध्येदेखील पुणे जिल्हा अग्रक्रमावर ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पुणे जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प राबवण्यासाठी आयोजित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके, पुणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ई-पिक पाहणीमध्ये देखील जिल्ह्याने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याच धर्तीवर शासनाच्या ‘महसूल वाढीमध्ये लक्षणीय वाढ करणे’ हे उद्दीष्ट असलेल्या ई-चावडी प्रकल्पातही अग्रक्रमावर रहावे.

यावेळी राज्य समन्वयक श्रीमती नरके यांनी ई-चावडी, ई -हक्क, ई-फेरफार या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ई-चावडी व ई-फेरफारमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण केले.

या कार्यशाळेत मंडळ अधिकारी, तलाठी यांनी चर्चा सत्रात भाग घेत आपली मते व अपेक्षा व्यक्त केल्या. चर्चासत्रात नोंदीचा कालावधी कमी करणे, ई-हक्क व ई-हक्कामध्ये नागरीकांचा सहभाग वाढविणे, तक्रार नोंदीचे प्रमाण कमी करणे यावर सविस्तर चर्चा झाली. याबाबत आवश्यक असल्यास आणखी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले.

प्रशिक्षण कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग मेकाले, पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुधीर संलंग, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

काय आहे ई- चावडी:
ई-चावडी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये नागरीकांना ऑनलाईन पद्धतीने अकृषिक कर व शेतसारा भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच तलाठी दप्तरातील गाव नमुने १ ते २१ यांचे संगणीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कामकाज जिल्ह्यामध्ये १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ९०६ गावांमध्ये ई-चावडी प्रकल्पामध्ये गाव नमुने १ ते २१ चे संगणीकरणाचे डाटा एन्ट्रीचे कामकाज सुरू करणेत आलेले आहे