May 17, 2024

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था-मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांची माहिती

पुणे, दि.२१: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च; माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा २० ते २३ मार्च तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना व पालकांच्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी दिली.

परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहान देण्याच्या उद्देशाने या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षेबाबत काही समस्या असल्यास समुपदेशकाच्या भ्रमणध्वनीवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय समुपदेशक पुढील प्रमाणे: पुणे जिल्ह्याकरीता गायत्री वाणी- ७३८७४००९७०, योगिनी पाटील- ९०१११८४२४२, सुजाता शिंदे- ८४२११५०५२८, पूनम पाटील ८२६३८७६८९६ ; अहमदनगर जिल्ह्याकरीता पूजा दोंदे- ८३६९०२१९४४. वर्षा शिंदे ८८२८४२६७२२, शीतल गुणदेकर ९८८१४१८२३६ आणि सोलापूर जिल्ह्याकरीता श्रेया दिघे -९३५९९७८३१५, पियुषा सामंत ७३८७६४७९०२, स्नेहा सडविलकर ९०११३०२९९७ या प्रमाणे समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली विभागीय स्तरावर संपर्क क्रमांक इयत्ता १० वी करीता ९४२३०४२६२७ आणि इयत्ता १२ वी करीता ७०३८७५२९७२ संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेअंतर्गत सुमारे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे विभागीय मंडळाच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर व सोलापुर या जिल्ह्यामधून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवरी-मार्च २०२४ परीक्षेस एकूण २ लाख ५९ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याकरीता पुणे जिल्ह्यात -२०, अहमदनगर-१७ आणि सोलापूर-११ अशी एकूण ४८ परिरक्षक तसेच पुणे जिल्ह्यात १९५, अहमदनगर ११० आणि सोलापूर-११८ अशी एकूण ४२३ परीक्षा केंद्रे आहेत.

माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ परीक्षेमध्ये एकुण २ लाख ७४ हजार ५१८ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. याकरीता पुणे जिल्ह्यात -२१, अहमदनगर-१८ आणि सोलापूर-१५ अशी एकूण ५४ परिरक्षक तसेच पुणे जिल्ह्यात २८५, अहमदनगर १८१ आणि सोलापूर-१८२ अशी एकूण ६४८ परीक्षाकेंद्रे आहेत.

भरारी पथकाची नेमणूक

परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्याकरीता व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याकरीता भरारी पथक नेमण्यात आली असून यात विभागीय आयुक्त कार्यालय, महसूल विभाग कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परीक्षा कालावधीत बैठे पथक मुख्य परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा देता यावी या उद्देशाने प्रत्येक केंद्रावर चोख बंदोवस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या अंतरात प्रवेशबंदी राहणार आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनियता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी व उत्तरपत्रिका आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहायक परिरक्षकांना जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील व उत्तरपत्रिकेच्या पृष्ट क्र. २ वरील सूचनांचे बारकाईने पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा सुरू असताना विषयाशी संबंधित अथवा अन्य कोणतंही हस्तलिखित कागद, वह्या, टिपण्या, मार्गदर्शिका, पुस्तकातील पान, पुस्तक, नकाशे आदी जवळ बाळगणे, कपड्यावर, रायटिंग पॅडवर, हातावर किवा शरीराच्या भागावर लिहून ठेवणे, टेबल, खुर्च्या, ड्युअल डेस्क विषयाशी संबंधित असलेले कॉपी साहित्य आढळणे आदी बाबी आढळून आल्यास त्या परीक्षार्थीची संबंधित विषयाची संपादणूक किंवा पुराव्याच्या आधारे संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात येईल.

मंडळाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकची चोरी करणे, मिळवणे, विक्री किंवा खरेदी करणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित करणे अशा स्वरूपाचे निदर्शनास आल्यास संपूर्ण परीक्षेची संपादणुक रद्द करणे, पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करणे यासह परीक्षार्थीविरुद्ध प्रकरणानुसार फौजदारी सायबर कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, यांची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असेही श्रीमती मिसकर यांनी कळविले आहे.